
बेलगाम प्राईड /चन्नेवाडी ता.खानापूर येथील कलमेश्वर मंदिर परिसरातील चारशे ते पाचशे वर्ष पूर्वीचे जुने वटवृक्ष पाऊस वाऱ्यामुळे अखेर मुळा पासून कोसळल्याची घटना काल रविवारी घडली.
गावातील जाणकारांच्या मतानुसार हे वटवृक्ष जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे कलमेश्वर मंदिर जवळ होते. या महाकाय वटवृक्षाबरोबर अनेकांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. अनेक पारंब्या त्या वटवृक्षाला असल्याने त्या पारंब्याना झोकाळत अनेक जणांचे बालपण यामध्ये रमले होते. कलमेश्वर मंदिराला आसरा देणारा हा वटवृक्ष होता, फक्त चन्नेवाडीच न्हवे तर नंदगड, कसबा नंदगड व महामार्गावरून जाणारेही मंदिराला येऊन वटवृक्षाच्या सावलीत आपले निवांत क्षण घालवत असत,अनेक गुराखी आपली जनावरे चारवण्यासाठी किंवा ऊन,वारा, पावसात आसरा घेण्यासाठी या वटवृक्षाखाली विसावत असत या वटवृक्षाच्याच सावलीखाली कलमेश्वर मंदिराचे अनेक कार्यक्रम व महाप्रसाद होत असत, गावातील सुवासिनींचा श्रद्धेचा वटवृक्ष म्हणून याकडे पाहिले जात असे, विसएक वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री.दीपक दळवी यांनी या वटवृक्ष पाहून त्याच्या विसाव्याखालीच आपले भाषण केले होते, बेळगावातील अनेक मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
असा हा ऐतिहासिक वटवृक्ष नामशेष झाल्याने अनेकांच्या आठवणी त्याचबरोबर इतिहास जमा झाल्या आहे. गावातील महिलांनी त्याच जागेवर नव्याने वटवृक्ष रोपन करून मंदिराच्या बाजूने सद्या आसऱ्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्याचा संकल्प केला आहे.




