Uncategorized
Trending

विनयभंग व मारहाणच्या प्रकरणात बसवनकुडचीतील आरोपींना शिक्षा

बेलगाम प्राईड/ बसवनकुडची येथे २०१५ मध्ये मारहाण आणि विनयभंगाच्या एका प्रकरणात बेळगावच्या २ जेएमएफ़सी न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच, न्यायालयाने आरोपींना ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यापैकी ६० हजार रुपये पाच पीडितांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना ७ फेब्रुवारी २०१५ रोजी बसवनकुडची येथील नागदेव गल्लीतील महानगरपालिकेच्या खुल्या जागेत घडली होती. या ठिकाणी महानगरपालिका बोर्ड लावत असताना प्रमोद पाटील, किरण पाटील, अमित पाटील, श्रीकांत उर्फ कुंतू पाटील, मल्लसर्जा बोगार, महेंद्र पाटील आणि सुनील उर्फ हृषब पाटील अशा एकूण सात आरोपींनी हातात लाठ्या घेऊन प्रवेश केला.

त्यांनी फिर्यादी सुजाता यल्लम्मनावर आणि त्यांचे पती अर्जुन यल्लम्मनावर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी सुजाता यांचा विनयभंग केला तर अर्जुन यांना लाठ्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या कल्लप्पा बोगार, रेखा बोगार आणि कल्लप्पा दोड्डण्णावर यांनाही आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी बेळगावच्या माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी क्रमांक १ प्रमोद पाटील आणि आरोपी क्रमांक ५ मल्लसर्जा बोगार यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्यात आला.

उरलेल्या पाच आरोपी (किरण पाटील, अमित पाटील, श्रीकांत पाटील, महेंद्र पाटील आणि सुनील पाटील) यांना न्यायाधीश गुरुप्रसाद सी. यांनी भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३२३, ३२४ आणि १४९ नुसार दोषी ठरवत ६ महिने कारावासाची शिक्षा आणि ६५,००० रुपयांचा दंड ठोठावला. या दंडातील ६०,००० रुपये पीडितांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महंतेश चळकोप्पा यांनी बाजू मांडत आरोपींना शिक्षा मिळवून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!