
बेलगाम प्राईड/ बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कंग्राळी खुर्द येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कंग्राळी गावाचे सुपुत्र हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि हुतात्मा बाळू निलजकर यांच्या स्मृतीस मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमात कमल मन्नोळकर, मनोहर हुंदरे, पियूष हावळ, आर. के. पाटील, डॉ. राजगोळकर, तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, अध्यक्ष मनोहर किनेकर आणि सचिव एम. जी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे महत्त्व, हुतात्म्यांचे बलिदान आणि आजच्या पिढीची जबाबदारी यावर विचार मांडले.
बैठकीच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या पत्नी पौर्णिमा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत हुतात्म्यांच्या त्यागाला कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन केले.
यावेळी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कन्येला साडी-चोळी देऊन समितीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




