
बेलगाम प्राईड/ सीमावासियांचे आधार आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वाहून घेतलेले शिक्षणतज्ञ डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी आज गांभीर्याने पाळण्यात आली.
त्यांच्या निधनाने सीमावासीय पोरके झाल्याची भावना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केली. सीमाप्रश्नाच्या चळवळीत आजही क्षणोक्षणी डॉ.एन.डी. पाटील यांची आठवण येते. त्यांच्या एका शब्दाखातर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते एकवटत असत. त्यांच्या जाण्याने सीमावासीय मोठ्या आधारापासून वंचित झाले आहेत असे किणेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
डॉ. पाटील यांचा स्मृतिदिन हा सीमाभागातील पहिल्या सत्याग्रहाच्या कालखंडाशी जुळून येतो, हा योगायोग त्यांच्या सीमाप्रश्नाबाबतच्या तळमळीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिवार, दिनांक 17 रोजी कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात डॉ. एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्तावना समितीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी केली. त्यानंतर माजी आमदार मनोहर किणेकर व लक्ष्मण होणगेकर यांच्या हस्ते डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, अनिल पाटील, मेगो बिर्जे, महादेव बिर्जे, दीपक पावशे, मनोहर संताजी, नारायण सांगावकर, आप्पासाहेब कीर्तने, संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




