
बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या संथ गतीवरून आमदार आसिफ सेठ यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामात होत असलेल्या विलंब सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, त्यांनी अधिकाऱ्यांची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली.
आमदार आसिफ सेठ यांनी विविध भागांतील रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी कामाची गती अत्यंत धीमी असल्याचे दिसून आले तसेच नियोजनाचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
“एल अँड टी सारख्या मोठ्या कंपनीकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कामाचा दर्जा आणि गती या दोन्ही बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट बजावले.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की, सर्व प्रलंबित कामे ठराविक कालमर्यादेतच पूर्ण झाली पाहिजेत. जर कामात सुधारणा झाली नाही, तर वरिष्ठ स्तरावर तक्रार करून कडक कारवाईचा करण्याचा इशारा दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीमुळे एल अँड टी प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून आता कामांना गती मिळणार का याकडे बेळगावकर वासियांचे लक्ष लागले आहे.




