
बेलगाम प्राईड/ कर्नाटकातील काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी संदर्भात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन आज महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
दिल्लीमध्ये आयईसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी झालेल्या भेटी संदर्भात त्यांनी सांगितले की “जर पक्षांतर्गत सुरू असलेले मतभेद त्वरित न मिटवल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.”
नवी दिल्ली येथे आयईसीसी अध्यक्षांची कांही आमदारांनी भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, “गेल्या सहा महिन्यांपासून पक्षांमध्ये सुरू असलेले अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी हाय कमांडशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आम्हाला या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्लीचा आपला हा दौरा सिद्धरामय्या यांच्या समर्थनात होता का? अशी विचारना करण्यात आली असता “आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विशेष समर्थनार्थ येथे आलेलो नाही. आमचा उद्देश केवळ पक्षाचे हितरक्षण करणे आणि अंतर्गत मतभेद समाप्त करणे हा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या या वक्तव्याने काँग्रेस गोटात नव्या चर्चेला उधाण आले आहे.




