
बेलगाम प्राईड / आंतरराज्य व आंतर जिल्हा पातळीवर वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सुमारे 95 लाख 50 हजार रुपये किमतीची 21 वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई माऱीहाळ पोलिसांनी केली
दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी माऱीहाळ पोलीस ठाणे हद्दीतील निलजी क्रॉस येथे एका घरासमोर उभी असलेली अशोक लेलँड कंपनीची मिनी गुड्स ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. ही घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. याप्रकरणी माऱीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 144/2025, कलम 303(2) बीएनएस-2023 अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवमोग्गा, भद्रावती आणि सांगली परिसरातील तिघे आरोपी रात्रीच्या वेळी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन प्रथम रॉयल एनफिल्ड मोटारसायकल किंवा सुजुकी ॲक्सेस स्कूटर चोरी करत असत. त्यानंतर त्या वाहनांवर फिरत योग्य संधी साधून उभी असलेली अशोक लेलँड मिनी गुड्स वाहने चोरी करत असल्याचे उघडकीस आले होते.
चोरी केलेली वाहने युसुफखान सिकंदरखान (वय 68) मादरमड्डी, धारवाड), जाकीर हुसेन मोहम्मदसाब परदेवाले (वय 47, धारवाड), आझाद इब्राहिम मुतवल्ली (वय 36) विजयपूर शहीक अहमद रफीक अहमद (वय 52) वेल्लूर, तामिळनाडू आणि बसीर अहमद अल्लाभक्ष मकानदार (वय 38) दांडेली यांना विकून त्यांची विल्हेवाट लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याचा शोध घेऊन त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एकूण 21 वाहने जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 8 अशोक लेलँड मिनी गुड्स ट्रक, 5 रॉयल एनफिल्ड मोटारसायकली, 5 सुजुकी ॲक्सेस स्कूटर्स, 2 हिरो होंडास्प्लेंडर मोटारसायकली आणि 1 होंडा डिओ स्कूटर यांचा समावेश आहे. ही वाहने बेळगाव, दावणगेरे, तुमकूर, बेंगळुरू तसेच महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि शिरोळ परिसरातून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर टी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली माऱीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. आर. पटनशेट्टी, पीएसआय मंजीुनाथ हुलकुंद, चंद्रशेखर सी., सीसीबीचे पीएसआय मंजूनाथ भजंत्री तसेच माऱीहाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि तांत्रिक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे. त्या पोलिसांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आली तसेच सरकारच्या वतीने त्यांना विशेष रूप बक्षीस जाहीर करण्यात आले.




