Uncategorized
Trending

सातारा येथे साहित्य संमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड

बेलगाम प्राईड / सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड झाल्याने साहित्यप्रेमी व कवी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शतकपूर्व परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनात बेळगावातील कवी सहभागी होणार असून ही बाब विशेष अभिमानास्पद मानली जात आहे.

दि. 1 ते 4 जानेवारी दरम्यान सातारा येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असून शनिवारी (दि. 3 जानेवारी) दुपारी आयोजित कवी कट्टा कविसंमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाचे कवी आपल्या कविता रसिकांसमोर सादर करणार आहेत.

कवी कट्ट्यासाठी चार कवींची निवड या कविसंमेलनासाठी कडोली येथील ज्येष्ठ कवी व शब्दगंध कवी मंडळ संघाचे माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, शब्दगंधचे सचिव कवी सुधाकर गावडे, कवी चंद्रशेखर गायकवाड तसेच कुद्रेमनी येथील कवी शिवाजी शिंदे यांची निवड झाली आहे. हे सर्व कवी आपल्या सशक्त शब्दशैली, सामाजिक जाणिवा आणि साहित्यिक योगदानासाठी परिचित आहेत.

99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शतकपूर्व साहित्य संमेलन म्हणून विशेष महत्त्वाचे मानले जात असून अशा ऐतिहासिक संमेलनात बेळगावातील कवींचा सहभाग हा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरत आहे. या निवडीमुळे बेळगावच्या साहित्यिक परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने निवड झालेल्या सर्व कवींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून साताऱ्यातील रसिकांकडून त्यांच्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!