कंग्राळी परिसरात भटक्या कुत्र्यांनी बालकांवर केला हल्ला कुत्र्यांचा वाढता उपद्रव

BelgaumPride -July 23, 2026
बेलगाम प्राईड/ कंग्राळी बी.के., कंग्राळी के.एच. तसेच पार्वती नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसें दिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत चार लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पी. टी. यांनी जिल्हाधिकारी आणि बेळगाव महानगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
अवधूत पी. टी. यांच्या नेतृत्वाखालील सोशल वर्कर टीमने जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बसस्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांचे स्थलांतर, आक्रमक किंवा रेबीजग्रस्त कुत्र्यांवर तातडीने कारवाई, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी निश्चित जागा निश्चित करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद न देणाऱ्या प्राणी कल्याण संस्थांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोशल वर्कर टीमने केली आहे. तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही टीमने दर्शविली आहे.




