सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन

बेलगाम प्राईड/ सर्वसामान्य गोरगरीब जनता सहकारी पतसंस्थांमध्ये आपली जमापुंजी ठेवत असते. संस्थेत गोरगरिबांचा पैसा असतो. सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मोलाची मदतही होते. अशावेळी सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन, बेळगाव क्रेडाईचं चेअरमन युवराज खुलजी यांनी बोलताना केले.
भारत नगर येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सभागृहात आज शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला युवराज हुलजी यांच्यासह सहकार खात्याचे निवृत्त सहाय्यक संचालक राजीव अक्की प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी वेदांत सोसायटीचे नूतन चेअरमन ज्ञानेश्वर सायनेकर, उपाध्यक्ष अँड. सोमनाथ धामणवर तसेच प्रमुख अतिथींचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ शाल घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना युवराज हुलजी म्हणाले, पतसंस्था चालविणे अत्यंत जखमीचे काम झाले आहे. पतसंस्थांचा कारभार सचोटी आणि विश्वासाने होणे महत्त्वाचे आहे. पतसंस्थांमधून सभासद जमापुंजी ठेवत असतात अशावेळी संचालकांवर महत्त्वाची जबाबदारी असते. लोकविश्वास कमावणे हेच पतसंस्थांचे मुख्य ध्येय असावे असेही हुलजी यांनी यावेळी सांगितले. राजीव अक्की म्हणाले, पतसंस्थांचे काम नियमानुसार होणे आवश्यक आहे. पतसंस्थांच्या कारभारात पूर्ण पारदर्शकता हवी असेही त्यांनी सांगितले.
वेदांचे नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर सायनेकर यांनी संस्थेने सोपविलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडू. सर्वांच्या सहकार्याने आणि सकारात्मक विचाराने संस्थेचे यशाची घौडदौड नेहमीप्रमाणे चालू राहील असा विश्वास व्यक्त केला. मावळते अध्यक्ष संदीप खंन्नुकर यांनी ऑनलाइन घोटाळे वाढले आहेत. अशा काळात लोकांचा सहकार क्षेत्रावरील विश्वास वाढत आहे असे स्पष्ट केले.पायोनिअर बँकेचे संचालक अनंत लाड, नूतन उपाध्यक्ष सोमनाथ धामण्णावर यांनीही यावेळी समायोचि विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संदीप खन्नुकर यांनी प्रास्ताविक तर संचालक जयकुमार पाटील यांनी अतिथींचा परिचय करून दिला. जयवंत खन्नुकर यांनी सूत्रसंचालन केले. कल्याणी सपकाळ यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.




