हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची बैठक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

बेलगाम प्राईड /दि.14 जून : इम्पोरिया टॉवर, गणेशपूर-हिंडलगा येथे धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे जानेवारी महिन्यात पार पडलेल्या 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानमार्फत दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात 29 वा हिंदू कार्यकर्ता समावेश मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला होता. हजारो हिंदू बांधव-भगिनींच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यासाठी रविवारी अवलोकन बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव भाजप नेते तथा भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे, भुजंग सादगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोमानाचे, अनिल पाटील, पंकज घाडी, शडाक्षरी हिरेमठ, सूर्याजी बिर्जे, उमेश पुरी, बाळू भडगावी, अनिल केसरकर यांच्यासह बेळगाव ग्रामीणमधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेत श्री मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच नारायण पाटील यांनी मेळाव्याचा सविस्तर अहवाल सादर केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानमार्फत दहावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यामध्ये बेळगाव ग्रामीणमध्ये प्रथम आलेली कु. प्राजक्ता उत्तम चौगुले, बेळगाव ग्रामीण कन्नड माध्यमात प्रथम आलेली कु. राधिका चंद्रशेखर बंगारी, बेळगाव शहर मराठी माध्यमात प्रथम आलेली कु. स्नेहा यल्लाप्पा हीरोजी, बेळगाव शहर इंग्रजी माध्यमात प्रथम आलेली कु. साईशा पवन देसाई, हायर एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेली कु. तृप्ती देसाई तसेच राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कु. दिव्या प्रदीप देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी रु. 5,000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील प्रेरणादायी अनुभव कथन करत या सन्मानाबद्दल श्री धनंजय जाधव यांचे आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात धनंजय जाधव यांनी हिंदुत्ववादी कार्याची आवश्यकता, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. गेल्या 30 वर्षांपासून सोबत राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “आपले अस्तित्व हे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या अतीव प्रेमावर टिकून आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच देणगीदारांचे आभार मानून श्री धनंजय जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.




