Uncategorized
Trending

चिक्कोडी–गोकाक नवीन जिल्हे जनतेची मते घेतल्या नंतर निर्णय — कृष्ण भैरेगौडा

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी आणि गोकाक हे स्वतंत्र जिल्हे म्हणून घोषित करण्याबाबत सरकार लवकरच नागरिक व लोकप्रतिनिधींचा अभिप्राय गोळा करणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी विधानसभेत दिली.

आमदार दुर्योधन महालिंगप्पा ऐहोळे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, मोठ्या जिल्ह्यांचे प्रशासनिक व्यवस्थापन कठीण होते. त्यामुळे लोकाभिमुख, जलद आणि प्रभावी प्रशासन देण्यात अडचणी निर्माण होतात. हे सरकारच्या निदर्शनास आले असून, बेळगाव जिल्ह्याचे दोन किंवा तीन स्वतंत्र जिल्ह्यात विभाजन करण्याच्या मागण्या वाढत आहेत.

“ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आहे. जनतेचा अभिप्राय, स्थानिकांची गरज, भौगोलिक परिस्थिती यांचे सविस्तर परीक्षण करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. योग्य वेळ पाहून सर्व बाजूंनी मते जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा करून पुढील पावले उचलली जातील,” असे भैरेगौडा यांनी स्पष्ट केले.

या चर्चेदरम्यान आमदार शशिकला जोल्ले आणि भालचंद्र जारकिहोळी यांनीही चिक्कोडी व गोकाक जिल्हा निर्मितीची आवश्यकता अधोरेखित केली. सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

काल सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पालकमंत्री सतीश जारकी होळी आणि त्यांचे बंधू आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली गोकाक जिल्हा होराट समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन गोकाक नवीन जिल्हा निर्मितीची मागणी केली होती. या अगोदर पासून गोकाक आणि चिकोडी दोन नवीन जिल्ह्यांची मागणी वाढू लागली आहे त्या अनुषंगाने बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच बेळगावच्या जिल्हा विभाजनाची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!